ask a question

महापुराचे थैमान


    "अरे पळा, पळा ! नदीला पूर आलाय ! उठा, उठा, पळा, पळा !" ही आरोळी ऐकली आणि आमच्या सगळ्यांच्या जिवाचा थरकाप उडाला. बाहेर येऊन पाहतो तो काय, जोरदार पाऊस कोसळत होता. नदीच्या पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता. जो तो जिवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता. आम्हीही तीच वाट धरली. जरूरीपुरते सामान बरोबर घेतले.
     घराबाहेर निघालो तोवर पाण्याचे लोंढे आमच्या घराला वेढत होते. त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट ! सगळेच भयानक !
     तेवढ्यात आमची सखूमावशी पाण्यात ओढली गेली. आईने टाहो फोडला ! थोड्याच वेळात झोपड्या, मातीची कच्ची घरे, गुरे-ढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागली. सगळीच स्थिती भयानक होती. त्यात वीज गेलेली. प्यायला पाणीच नव्हते. आसऱ्यासाठी कोरडी जागा नव्हती. सगळेजण दयनीय नजरेने इकडेतिकडे बघत होते.
     पळत-पळत आम्ही टेकडीवर पोहोचलो. देवळाचा आसरा घेतला. पण पावसाच्या माऱ्यापुढे कोणाचाच निभाव लागत नव्हता. वयोवृद्ध माणसे, रुग्ण आणि तान्ही बाळे यांचे आता कसे होणार? सर्वांनाच काळजी लागून राहिली होती. काही वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे, औषधे, पिण्याचे पाणी आणि ब्लॅंकेटचा पुरवठा झाला. थोडेसे हायसे वाटले. मी माझ्या मित्र-मैत्रिणींसह स्वयंसेवक व्हायचे ठरवले. अन्न-पाणी वाटणे, औषधे देणे, इत्यादी कामे आम्ही मनापासून केली.
     दुसऱ्या दिवशी पूर ओसरला. नदीच्या किनाऱ्यावर दलदल झाली होती आणि प्रचंड प्रमाणात कचरा पसरला होता. कुजलेल्या कचऱ्यात मेलेली जनावरेही होती. त्यांची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती.
     जेमतेम शाळेत पोहोचलो पण तेथेही वाईट स्थिती होती. मुसळधार पावसामुळे शाळेतील वह्या-पुस्तकांचा लगदा झाला होता. ते सगळे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
     पुढे पूर ओसरला पण मातीत मिसळलेला भाजीपाला, नदीचा गाळ आणि गढूळ पाणी पाहून सगळेच विषण्ण झाला होते. 
time: 0.0171079636